Friday, December 25, 2020

|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||

 

|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||


“नारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” (महाभारत आदिम श्लोक)

         गिताजयंती म्हणजे ज्यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धात मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. ही घटना कुरुक्षेत्रावर घडली, जे आत्ताच्या  हरियाणामध्ये आहे.

        “महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हांइतकीच आजही ती नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या शिकवणीचा प्रभाव हा केवळ तात्विक किंवा विद्व्चर्चेचा विषय नसून, आचारविचारांच्या क्षेत्रात जिवंत आणि लगेच जाणवणारा आहे. एका राष्ट्राचें आणि संस्कृतीचें पुनरुज्जीवन गीतेची शिकवण प्रत्यक्ष घडवीत आहे. जगांतील श्रेष्ठ शास्त्रग्रंथात तिचा एकमताने समावेश झाला आहे.” योगी अरविन्द घोष

          “माझ्या बालपणीच्या आयुष्यांत मोहाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन  करणाऱ्या शास्त्र-ग्रंथाची गरज मला भासली. मी कोठें तरी वाचलें होतें कीं, अवघ्या सातशें श्लोकांच्या मर्यादेत गीतेनें साऱ्या शास्त्रांचें व उपनिषदांचे सार ग्रथित केलें  आहे. माझ्या मनाचा निश्चय झाला. गीता वाचतां यावी म्हणून मी संस्कृत शिकलों. आज गीता माझें बायबल किंवा कुराण तर काय, परंतु त्यापेक्षांही अधिक, प्रत्यक्ष माताच झाली आहे. माझ्या लौकिक मातेस मी फार पूर्वीच अंतरलो; परंतु तेंव्हापासून या गीतामाऊलीने माझ्या जीवनांत तिची जागा पूर्णपणें भरून काढली. आपत्काली तिचाच मी आश्रय घेतों.” राष्ट्रपिता महात्मा गांधी (बनारस-कानपूरची भाषणें)             

          आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांचे मौलिक योगदान आहे अशी हे दोन महान पुरुष. त्यांच्या ह्या विचारांकडे पाहिले किे, गीतेच्या महतत्त्तेचे दर्शन घडते आणि म्हणूनच गीताजयंतीच्या निमित्तानें श्रीमद्भगवद्गीतेबाबतच्या काही व महत्वपूर्ण गोष्टींचे पुनः एकदा एकदा स्मरण करणें हितावह ठरेल.

          संत ज्ञानेश्वर माऊलीने अर्जुनाच्या असहाय्यतेचे, वैषम्यतेचे व नैराश्याचे खूपच प्रत्यवाही वर्णन सार्थ ज्ञानेश्वरीत विषादयोगात केले आहे, “येणें नावेंचि नेणों कायी| मज आपणपें सर्वथा नाहीं | मन बुद्धी ठायीं | स्थिर नोहे ||९५|| देखे देह कांपत | तोंड असे कोरडें होत | विकळता उपजत गात्रांसीही ||९६|| सर्वांगा कांटाला आला | अति संतापु उपनला | तेथ बेंबळ हातु गेला | गंडिवाचा ||९७|| तें न धरताचि निश्ट्लें | परि नेणेंचि हातोनि पडिलें | ऐसें हृदय असें व्यापिलें | मोहें येणें ||९८|| जे वज्रापासोनि कठीण | दुर्धर अतिदारूण | तयाहून असाधारण | हें स्नेह नवल ||९९||” (सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय:पहिला: अर्जुनविषादयोग) अशी गलीतगात्र अवस्था झाली अर्जुनाची आणि तो हताश होऊंन  रथात खाली बसला.

          अवसान गळून पडलेल्या अर्जुनाच्या अंत:करणातील भाव त्याच्या व्याकुलतेची साक्ष देतात. “अवधारी मग तो अर्जुनु | देखोनि सकळ स्वजनु | विसरला अभिमानु | संग्रामींचा ||४|| कैसी नेणों सदयता | उपनली तेथें चित्ता | मग म्हणे कृष्णा आतां | नसिजे एथ ||५|| माझें अतिशय मन व्याकुळ  | होतसे वाचा बरळ || जे वधावे हे सकळ | येणें नांवे ||६||” (सार्थ ज्ञानेश्वरी: अध्याय पहिला: अर्जुनविषादयोग)            

          अर्जुनाची अशी अवस्थाच झाली नसती तर भगवान् श्रीकृष्णाला श्रीमद्भगवद्गीता सांगण्याची गरजच पडली नसती, पण नियतीचे ठरलेल होते, जसे अहिल्येची मुक्ती श्रीरामाच्या पदस्पर्शाने झाली.

          महाभारतात येकुण अठरा पर्वे असुन, त्यात २,२०,००० ओळी आहेत. महाभारतात सहावे ‘भीष्मपर्व’ आहे. त्यात एकूण ११७ अध्याय आहेत, भीष्मपर्वात,  श्रीमद्भगवद्गीता सांगितलेली आहे. [कंसात अध्यायाची नांवे व श्लोक संख्या नमूद केलेली आहे.] 

आदिपर्व (अध्याय-२२५,श्लोक-७,१९७), सभापर्व (अध्याय-७२,श्लोक-२,३९०), वनपर्व (अध्याय-२९९,श्लोक-१०,३३८), विराटपर्व (अध्याय-६७,श्लोक-१,८२४), उद्योगपर्व (अध्याय-१९७,श्लोक-६,०६३), भीष्मपर्व (अध्याय-११७,श्लोक-५,४०६), द्रोणपर्व (अध्याय-१७३,श्लोक-८,१९२), कर्णपर्व (अध्याय-६९, श्लोक-३,८७१), शल्यपर्व (अध्याय-६४,श्लोक-३,३१५), सौप्तीकपर्व (अध्याय-१८,श्लोक-७७२), स्त्रीपर्व (अध्याय-२७,श्लोक-७३०), शांतिपर्व (अध्याय-३५३, श्लोक-१२,९०२), अनुशासनपर्व (अध्याय-१५४,श्लोक-६,४३९), अशवमेधिकापर्व (अध्याय-९६,श्लोक-२,७४३), आश्रमवासिकापर्व (अध्याय-४७,श्लोक-,१०६२), मौसलापर्व (अध्याय-९,श्लोक-२७३), महाप्रस्थानिकापर्व (अध्याय-३,श्लोक-१०६), स्वर्गावरोहणपर्व (अध्याय-५,श्लोक-१९४).

          शास्त्रज्ञानी नुकत्याच केलेल्या कार्बन डेटिंगच्या तंत्रज्ञानानुसार केलेल्या संशोधनानुसार, द्वारका साधारणत: ३२,००० वर्षापूर्वी अस्तित्वात होती.  

[https://pparihar.com/2014/01/21/32000-year-old-lost-city-of-dwarika-krishna-indian-hinduism-is-not-mythology/]

महाभारत त्याच्या किमान काही वर्षें आधी झाले असावे. अर्थातच, महाभारताचा काळही तितकाच जुना आहे. महाभारत हे जगातील दुसरे सर्वात मोठे महकाव्य आहे. वेद हे ‘श्रुती’ असून, महाभारत हे ‘स्मृति’ ग्रंथात मोडते.

श्री. जेम्स एल फिजराल्ड, संस्कृत प्राध्यापक, ब्राऊन विश्वविद्यालय, प्रॉव्हिडेन्स, ह्रोड आयलंड, अमेरिका, असे म्हणतात, “Simply The Mahabharat is a powerful and amazing text that inspires awe and wonder. It presents sweeping visions of the cosmos and humanity and intriguing and frightening glimpses of divinity in an ancient narrative that is accessible, interesting and compelling for anyone willing to learn the basic themes of India’s culture. The Mahabharat definitely is one of those creations of human language and spirit that has travelled far beyond the place of its original creation and will eventually take its rightful place on the highest shelf or world literature besides Homer’s epics, the Greek tragedies, the Bible, Shakespeare and similarly transcendent works.”  

[www.factsanddetails.com/world/cat55/sub354/entry-5627.html]

          भारतीय संस्कृतीचा भगवद्गीता हा एक महान ग्रंथ आहे, ज्यात युद्ध व शांतता, मान व अपमान, प्रामाणिकपणा व द्रोह अशा विविध गोष्टींचे दर्शन घडते. इसवीसनाच्या ९व्या शतकापासून भगवदगीतेवर, शंकराचार्य, रामानुज, माधवाचाऱ्य, निंबार्क आणि अभिनवगुप्त यांनी वेगवेगळे टिकात्मक ग्रंथ लिहिलेत. १३ व्या शतकात मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरानी सार्थ ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली आहे. इंडोनेशियामध्ये जुन्या जावा भाषेत भगवदगीतेचा अनुवाद झालेला आहे. राजाराम मोहनरॉय यांनी गीतेबाबत असे म्हटले आहे की, “गीता सर्व शास्त्राचे सार आहे.”

          श्रीमदभगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर सर्वप्रथम १७८५ मध्ये चार्ल्स विलकिन यांनी केले. [https://en.wikipedia.org/wiki/Charles_Wilkins] या भाषांतरचा परिणाम राल्फ वालडो इमर्सन यांच्यावर झाला व तो त्यांच्या ‘ब्रम्हा’ या कवितेत दिसुन येतो.

[https://www.poetryfoundation.org/poems/45868/brahma-56d225936127b]

अलीकडच्या काळात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे यांनी, १९१९ मध्ये महाभारताच्या संशोधित प्रतीवर काम करण्यास सुरुवात करून ते काम १९६६ मध्ये पूर्ण केले. त्यात श्री. व्हि एस सुखटणकर यांच्या शिवाय, इतर १० संस्कृत पंडितानी काम केले होते. ती प्रत आजही तेथे उपलब्ध असून त्यात एकूण १९ खंड व एकूण १३,००० पृष्ठे आहेत.

         भगवद्गीता आता पर्यन्त, चायनीज, स्पॅनिश, रशियन, अरेबिक, पोर्तुगीज, बंगाली, हिन्दी, मराठी, फ्रेंच, मलाय, जर्मन, स्वाहिली, जपनीज, फारसी, विएतनामीज, इंडोनेशियन, जावाणीज, तमिळ, कोरियन, टर्किश, तेलगू, इटालियन, थाई, कयानटोणीज, कन्नड, गुजराथी, पॉलिश, बरमिज, मोलडोवन, युक्रेनियन, उरिया, डच, तागलोग, योरुबा, आफ्रिकन, नेपाळी, सिंहली, हंगेरीयन, ग्रीक, अजरेबेजाणी, आकान, झेक, बुलगेरीयन, स्विडीश, श्लोवाक, लिथुयानियन, मकडोणीयन, श्लो वेणीयण, लॅटीवहीयन, सऱ्बो क्रोशीयन, आमहरीक, पापीआमेनटू, काटलान, फान्ति, बोसणीयन, एसपरनेतो, तुरकमेणियन, नेवारी, जॉर्जियन, कझाक, भोजपुरी इतक्या भाषेत, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉनशसनेस यांनी त्यांच्या “गीता जशी आहे तशी” या पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध केलेली आहे, व जवळपास अजून किमान ५० भाषामध्ये काम चालू आहे.  

[https://vanimedia.org/wiki/Introduction_to_Bhagvad-gita_in_108+_Languages]

         संजयाने ती जशी आणि जेव्हा प्रत्यक्षात घडत होती, त्याच वेळेस धृतराष्ट्राला सांगितली. संजय हा अंध धृतराष्ट्राचा सचिव होता. संजयाला त्याचे गुरु महर्षि व्यासानी असा आशिर्वाद दिला होता की, त्याला दुरून रणांगणावर सुरू असलेल्या घटना पाहता येतील.

         अनेक प्रयत्न व भगवान् श्रीकृष्णाची शिष्टाई निष्फल ठरल्यानंतर शेवटी महाभारताचे युद्ध अटळ झाले. अर्जुनाबद्दल सहानुभूति व मित्रप्रेम यामुळे भगवान् श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करण्याचे मान्य केले. युद्धाच्या ठरलेल्या दिवशी कौरव व पांडवाच्या सेना एकमेकसमोर येऊन उभ्या ठाकल्या. “सेनयोरूभयोर्म्ध्ये रथं स्थापय मेsच्युत ||१.२१||” युद्ध सुरू होण्याच्या आधी, अर्जुनाने श्रीकृष्णाला त्याचा रथ युद्ध भूमीच्या एकदम मध्यभागी नेण्यास सांगितले व त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ मध्यभागी नेऊन उभा केला. त्याठिकाणी, अर्जुनाने, पितामह भीष्म व ज्यांनी त्याला धनुर्विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविले ते गुरु द्रोणाचार्य, यांना समोर कौरवाच्या सेनेमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या हृदयाची धडधड वाढली, ती भीतीमुळे नाहीतर महान पितृतुल्य महर्षिना युद्धात सामोरे जाण्यामुळे.

         “दृष्टेमं स्वजनं कृष्ण यूयुत्सुं समुपस्थितम् ||१.२८|| सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति | वेपथुशचय शरीरे मे रोमहर्षशच्य जायते ||१.२९|| गांडीवं स्त्रंसते हस्तात्वकैव परिदह्यते| न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: || १.३० ||” [अध्याय १ ला] त्याच्या शरीराला कंप सुटला. त्याच्या अंत:कर्णाला अनेक शंकानी ग्रासून टाकले व अर्जुन त्याचे क्षत्रिय कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ झाला. अत्यंत निराश व हताश झालेले अर्जुनाने आपला प्रिय व विश्वासू मित्र श्रीकृष्णास आपली व्यथा सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यावेळी भवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केले मार्गदर्शन व बोध म्हणजेच अतिशय पवित्र भगवदगीता. भगवंताने सर्वात शेवटी भगवद्गीतेतील ज्ञान कुणास सांगावे याच्याकरिता एक अट सांगितलेली आहे.

          “इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन | न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योsभ्यसूयति ||१८.६७||” श्रीमद्भगवद्गीता अगाध व असिम आहे. भगवद्गीता प्रस्थानत्रयी पैकी एक आहे. मानवाच्या कल्याणाचे तिन मार्ग आहेत, “भगवद्गीता”,  “उपनिषद”, व “ब्रम्हसूत्र”. उपनिषदामध्ये “मंत्र” आहेत. ब्रम्हसुत्रामध्ये “सूत्रे” आहेत आणि भगवदगीतेमध्ये “श्लोक” आहेत. कोणत्याही देशाचा, समुदायाचा, सांप्रदायाचा, वर्णाचा असला तरीही सर्वांच्या उपयोगाचा असा हा ग्रंथ आहे. भगवदगीतेमध्ये एकूण अठरा अध्याय असून ७१३ श्लोक आहेत. अध्याय, त्याचे नाव   त्यातील श्लोकांची संख्या खालील प्रमाणे आहे.  

पहिला अध्याय:अर्जुन विषाद योग (४७), दुसरा अध्याय:सांख्ययोग (७२),

तीसरा अध्याय:कर्मयोग (४३), चौथा अध्याय:ज्ञानकर्मसन्यासयोग (४२),

पाचवा अध्याय:कर्मसन्यासयोग (२९), सहावा अध्याय:आत्मसंयमयोग (४७),

सातवा अध्याय:ज्ञानविज्ञानयोग (३०), आठवा अध्याय:अक्षरब्रम्हयोग (२८),

नऊवा अध्याय:राजविद्याराजगुहययोग(३४),दहावा अध्याय:विभूतियोग (४२),

अकरावा अध्याय:विश्वरूपदर्शनयोग (५५),बारावा अध्याय:भक्तियोग (२०),

तेरावा अध्याय:क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग (३४), चौदावा अध्याय:गुणत्रयविभागयोग(२७), पंधरावा अध्याय:पुरुषोत्तमयोग (२०), सोळावा अध्याय:दैवासुरसंपद्विभागयोग (२४),

सतरावा अध्याय:श्रद्धात्रयविभागयोग (२८),अठरावा अध्याय: मोक्षसंन्यासयोग (७८).    

 

जगात आज होत असलेली मूल्यांची घसरण ही होणारच होती व आहे, आणि ती तशी भारतात देखिल होणार आहे. तशा प्रकारची भविष्यवाणी फार पूर्वी श्रीमद्भागवतात (१२.२.१) केलेली आहे.

          “ततश्चनुदिनं धर्म: सत्यं शौचं क्षमा द्या | कालेन बलिना राजन् नङ्गक्षत्यायुरबलं स्मृति: || याचा अर्थ कलियुगात धर्म, सत्य, स्वच्छता, दया, आयुष्यमान, शारीरिक क्षमता, ताकद व स्मृति यांचा ऱ्हास होईल. खरे तर याच गोष्टीमुळे मनुष्य हा प्राण्यांपासून वेगळा आहे आणि ह्या शक्ति मानवाच्या कमी झाल्या तर मग मानवात व प्राण्यांत काय फरक राहिला, परंतु घाबरण्याचे काहीच कारण नाही; कारण भगवान् श्रीकृष्णांनी गीतेच्या ९ व्या अध्यायात सोपा उपाय सांगितलेला आहे.

          “अनन्याश्चिंतयंतोमां ये जना: पर्युपासते | तेशामंनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || (अध्याय-९, श्लोक-२२). जे अनन्यनिष्ट लोक माझें चिंतन करून मला भजतात, त्या नित्य योगयुक्त पुरुषांचा योगक्षेम मी चालवित असतो. न मिळालेली वस्तु मिळणे याचेंच नांव योग व  मिळविलेल्या वस्तूचें संरक्षण करणें म्हणजे क्षेम, अशी योगक्षेम याची व्याख्या शाश्वतकोशातही (१०० व २९२ श्लोक) (गीतारहस्य: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक: पृष्ठ ३८३, आवृत्ती-पंधरावी-१९९०) केलेली असून, त्याचा एकंदर अर्थ ‘संसारातील नित्य निर्वाह’ असा आहे, आणि परमेश्वराची बहूत्वाने जें सेवा करितात त्यांचे पुढे काय होते. “येsप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:| तेsपि मामेव कौंतेय यजन्त्यविधिपूर्वकम् ||२३||” श्रद्धेनें युक्त होत्साते दुसऱ्या देवताचे भक्त बनून जे यजन करितात हे कौंतेया ! तेहि विधिपूर्वक नसलें तरी (पर्यायाने) माझेंच यजन करितात कारण, “अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च| न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्चवन्ति ते ||२४||” सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी मीच आहे, पण त्यांना माझें तत्वत: ज्ञान नाहीं म्हणून ते घसरत असतात. वास्तविकपणे, “एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यंग्निं यमं मातरिश्वावानमाहू:|” (ऋग्वेद-१६४.४६) परमेश्वर एक असून त्याला पंडित लोक अग्नि, यम, मातरिश्वा (वायु) अशी अनेक प्रकारची नांवे देत असतात असे म्हटले आहे आणि म्हणूनच “आकाशात पतितं तोयम यथा गच्छ्ती सागरमं | सर्व देव नमस्कार:, केशवमं प्रतिगच्छ्ती|” (विष्णुसहस्त्रनाम)  

          सारांशरूपाने असे म्हणता येईल कि, दोन श्लोक जर दररोज वाचले तर एक वर्षात संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता वाचून होऊ शकते, जे उपनिषद सार आहे. या पवित्र दिवशी सर्वाना गिताजयंतीच्या अनेक शुभेच्छा! सर्व वाचकांना


 

No comments:

Post a Comment

Welcome. Thanks for your comments

|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||

  || श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार || “नारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” ( ...